तळोधी (बा.) – शनिवार , 06/09/2025 रोजी तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील गोसीखुर्द कालव्यात अडकलेल्या चितळाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्वाब बचाव दल आणि वनविभागाने सहा तास चाललेली मोहिम राबविली. सायंकाळी साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत स्वाबचे प्रमुख जीवेश सयाम, अध्यक्ष यश कायरकर, गणेश गुरणुले, आदित्य नान्हे यांनी कालव्यामध्ये उतरून चार किलोमीटर या चितळाचा पाठलाग केला आणि दोराद्वारे पकडून सुरक्षित बाहेर काढले।
चाललेल्या मोहिमेत वनरक्षक पंडित मेकेवाड, स्वाब सदस्य अनमोल सेलोकर, साहिल अगळे, देवेंद्र उईके, वन मजूर वामन निकुरे यांची देखील साथ होती. मोहिमेनंतर चितळाला जंगलाच्या दिशेने सोडल्यावर तो रात्रीच्या अंधारात धुम ठोकला. अंदाजे सात ते आठ वर्षे वयाच्या नर चितळाला जीवदान देण्यात आले.
विशेष म्हणजे गोसीखुर्द कालवा तळोधी वनपरिक्षेत्रातून खुला जात असल्यामुळे या कालव्यामध्ये नियमितपणे रानगवे, नीलगाय, रानटी डुकरे, चितळे तसेच पाळीव प्राणी पडतात. सध्या पाणी कमी असल्यामुळे जीवितहानी टळली असली, तरी भविष्यात पाणी वाढल्यास प्राण्यांचे मृत्यू होण्याची भीती कायम आहे.
स्वाब बचाव दल व वन विभागाचे पदाधिकारी म्हणतात, “या कालव्यावर पूल व पायऱ्या निर्माण केल्या गेल्या तर वन्यजीवांना सुरक्षित मार्ग मिळेल, अन्यथा अशी जीवितहानी भविष्यात होईलच.”
रोशन खानकुरे
तळोधी – गोसीखुर्द: सहा तास चाललेल्या मोहिमेत अंधारात स्वाब व वनविभागाने चितळ सुरक्षित बाहेर काढले
Oplus_131072 