नागभीड (दि. ३० ऑक्टोबर २०२५) — नागभीड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गावर दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झुडपांमुळे व साचलेल्या कचर्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची दृश्यमानता कमी झाल्याने अचानकपणे प्राणी व वाहने समोर येतात आणि त्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत.
या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नागभीड येथे विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन निवेदन सादर केले. या निवेदनात रस्त्याच्या दोन्ही बाजूची झुडपी झाडं तातडीने छाटून मार्ग स्वच्छ करावा, तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनादरम्यान मा. कृष्णाभाऊ गंजेवार (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागभीड), मा. मनोजभाऊ लडके (तालुका अध्यक्ष, शिवसेना शिंदे गट, नागभीड), विशाल बावणे (शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागभीड), श्रीकांत पिसे (शहर अध्यक्ष, शिवसेना शिंदे गट, नागभीड), हरिचंद्र जीगरवार, विनायक बुडमेवार, चक्रधर झोडे (शहराध्यक्ष, वाढोणा) आणि गिरीशभाऊ नवघडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नेत्यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील झुडपांची तातडीने छाटणी, कचरा हटविणे आणि सावधानता फलक लावण्याची मागणी केली. अन्यथा मोठ्या अपघातांची जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
“जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, प्रशासनाने झोपेतून जागं व्हावं!” — उपस्थित नेतेमंडळींचा इशारा
नागभीड तालुक्यात अपघातांचा धोका वाढला!रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झुडपं व कचरा; जनतेच्या सुरक्षेसाठी नेत्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
Oplus_131072 