चंद्रपूर :
शासनाच्या आदेशानुसार अंमली पदार्थ नाश करण्यासाठी १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल १७ गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
मा. न्यायालय, चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी घेऊन हा नाश महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (नागपूर युनिट), मंडवा, बुटीबोरी औद्योगिक वसाहत, नागपूर येथे करण्यात आला. यात १६ गुन्ह्यांतील ३०५ किलो ८८६ ग्रॅम गांजा व एका गुन्ह्यातील ८ किलो ५० ग्रॅम डोडा पावडर असा एकूण ३१३ किलो ९३६ ग्रॅम अंमली पदार्थांचा समावेश होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नाश समितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक अमोल काचारे, स.फौ. अरुण खारकर, पो.हवा. प्रमोद डंभारे, पो.हवा. सुधीर मत्ते, पो.हवा. दीपक डोंगरे, पो.कॉ. प्रदीप मडावी, अमोल सावे व मिलिंद टेकाम यांचा सहभाग होता. पंचांच्या उपस्थितीत शासकीय नियमानुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
